रविवार, २६ जून, २०१६

बाजार स्वातंत्र्याची किंमत ?



         बाजार स्वातंत्र्याची किंमत ?
देशाच्या अर्थव्यवस्थेत ज्या वेगानी अन् ज्या प्रकारचे बदल होताहेत त्यानी आपण सारे भांबावून गेलो आहोत. अनेक वर्षांचे बंदिस्तपणाचे संस्कार पुसले जाणे कठीणच जाणार. आजवर सा-या समस्यांची वर्दी वा गा-हाणे  सरकारनामक व्यवस्थेपर्यंत पोहोचवली की त्याच्यापुढे काही असावे याचा विचार करण्याची गरज नसे. सरकारही आपल्या पातळीवर ऊकल झाली तर ठीक, नाहीतर सदरची  समस्या जगात सार्वत्रिक असल्याचा हवाला दिला जात असे. मात्र जागतिकीकरणामुळे अलिकडच्या या घडामोडींमध्ये देशांतर्गताबरोबर सरकारच्या परिघाबाहेरची कारणे अधोरेखित होऊ लागल्याने आपले मायबाप सरकारही आपल्यासारखेच गटांगळ्या खात असल्याचे दिसते आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा राजकीय प्रश्नांपेक्षा आर्थिक प्रश्नांना प्राधान्य व धार आली आहे, त्यामुळे या सा-या प्रकाराकडे थोडे अर्थसाक्षर होऊन महागाई, करप्रणाली व अनुदाने यांकडे व्यापकतेने पाहिले तरच  सारे व्यवस्थित समजून घेता येईल. 
जागतिकीकरण, खुलीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या सा-या प्रक्रियांचा बाज व दिशा एकच असून बंदिस्तपणाकडून खुलेपणाकडे, नियंत्रणाकडून मुक्ततेकडे, शासनाकडून जनतेकडे, सत्तेकडून सहभागाकडे, एकाधिकाराकडून विनियंत्रणाकडे म्हणजे एकंदरीत बंधनांकडून स्वातंत्र्याकडे असल्याने केवळ महागाई च्या मुद्याशी जोडून या प्रक्रियेलाच विरोध करणे सयुक्तीक होणार नाही. सरकारच्या या कर-अनुदान-दरवाढीच्या सापळ्यातून कायमची सुटका होत असेल तर आज दिसणारी ही महागाई न समजता आपल्या स्वातंत्र्याची किंमत समजली पाहिजे.  
1984 साली राजीव गांधी पंतप्रधान असतांना तत्कालिन अर्थव्यवस्थेत बंदिस्तपणाचे दुष्परिणाम दृग्गोचर होऊ लागताच आहे त्या व्यवस्थेत फारसे बदल न करता तंत्रज्ञानाच्या मदतीने काही करता येते का असा त्यांचा प्रयत्न होता. जागतिकीकरणाचे वा खुलीकरणाचे जगभर चाललेले प्रयोग समोर दिसत असले तरी भारतातील सरंजामी व्यवस्थेचा विरोध लक्षात घेता या धारिष्ट्याला खूप बळ लागले असते. दरम्यान या आर्थिक अधोगतीचा परिपाक होत भारतावर आलेल्या आर्थिक अरिष्टातून बाहेर पडण्यासाठी काँग्रेसच्या राजवटीत नरसिंहराव व मनमोहन सिंगांना नाईलाजाने का होईना ही धोरणे स्वीकारावी लागली. त्यानंतर काँग्रेसच्या विरोधात निवडून आलेल्या भाजपाप्रणित एनडीए सरकारला हीच धोरणे पुढे नेणे भाग पडले. या धोरणाला सैध्दांतिक विरोध असणा-या कम्युनिस्टांनाही स्वतःची सत्ता असणा-या राज्यांमध्ये याच धोरणांचा पाठपुरावा करावा लागला व आपली सत्ता टिकवावी लागली. म्हणजे सरकारला यात निवडीचा पर्याय राहिला नसल्याचे दिसते.   
या सा-या प्रक्रिया जर खरोखरच एवढ्या चांगल्या असतील तर त्याचे फायदे सर्वसामान्यांना का होत नाहीत हा सर्वसाधारण जनतेला पडलेला प्रश्न आहे व काही प्रमाणात तो रास्तही आहे. एकादा विद्यार्थी नापास झाला म्हणजे त्याच्या अपयशाला तो स्वतः, त्याचे शिक्षक वा शाळा किंवा त्याचे पालक जबाबदार आहेत हे ठरवणे जेवढे कठीण आहे तेवढेच या प्रश्नाचे उत्तर कठीण आहे. मात्र या धोरणांचा जनतेला जाणवण्याइतपतचा फायदा न मिळू देण्यात ज्या पध्दतीने ही धोरणे राबवली गेली त्यातील सरकारची अनास्था व या प्रक्रियेला सर्वच पातळीवर झालेला उघड वा छुपा विरोध यांनाच जबाबदार धरता येईल. स्वातंत्र्य मिळवतांना झालेला अगोदर स्वातंत्र्य की सामाजिक सुधार हा वाद गाजला होता. स्वातंत्र्याची फळे चाखायची असली तर समाज सुधारलेला असला पाहिजे हे आतातरी स्वीकारायला हरकत नसावी. तशीच काहीशी परिस्थिती जागतिकीकरण स्वीकारण्याबाबत झाली असल्याचे दिसते. जागतिकीकरणाचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहचायला केंद्रात एक भक्कम, संवेदनशील व निर्णयक्षम सरकार लागते. ही धोरणे राबवायला कार्यक्षम, पारदर्शक व स्वच्छ प्रशासन व्यवस्था लागते. देशातील न्यायव्यवस्था तत्पर तसेच देशातील कायदा व सुव्यवस्था सक्षम असायला लागते. लोकांमध्ये सचोटी, प्रामाणिकपणा व सामाजिक न्यायाची भावना असायला लागते. अर्थव्यवस्था सुदृढ नसली तरी खोटे चलन, काळा पैसा वा घोटाळ्यांनी बरबटलेली नसावी. या सा-यांचा विचार केला तर आपले नेमके दुखणे काय आहे हे आपणास कळू शकेल. आपल्याला या निमित्ताने ख-या कारणांचा शोध घेता आला तर या सा-या नव्या धोरणांचे फायदे मिळवण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ.
किंमती कमी करण्यासाठी वाजवी करआकारणीची आता मागणी होऊ लागली आहे. अर्थक्रांतीसारख्या कररचनेत मूलगामी परिवर्तन सुचवणा-या संकल्पना येत आहेत. शेतीतील उत्पादनाचे विविध मार्ग शोधले जात असून भारतीय कृषिक्षेत्राला संजीवनी ठरू शकेल असा इंधनात इथेनॉल मिसळवण्याचा पर्याय असून सरकारने तसा कायदाही केला आहे. मात्र असे असून सुध्दा सरकारी तेल कंपन्या याबाबतीत अक्षम्य अनास्था दाखवीत आहेत. ब्राझीलसारख्या देशात ४० टक्क्यांपर्यंत इथेनॉल इंधन म्हणून वापरले जाते. विनियंत्रणाच्या विरोधातली ही पहिली पायरी आहे. खाजगी क्षेत्रातील स्पर्धा उभी रहाताच आपला एकाधिकार व कर-अनुदानातील हत्यारे वापरून खाजगी क्षेत्रातील रिलायन्स, इस्सार व शेल कंपनीचे पंप बंद पाडण्यात आले आहेत. म्हणजे या क्षेत्रात स्पर्धा येऊन ग्राहकांचे हित येण्यात या सरकारी कंपन्यांचाच अडथळा असल्याचे सिध्द झाले आहे. अशा ग्राहकविरोधी मनमानी कंपन्यांना मोकळे रान देणे हे आताच्या महागाईपेक्षा अनेक पटीत महाग पडल्याचे सिध्द झाले आहे.  
    अनुदानांचा मुद्दाही तेवढाच चर्चेला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील अनुदानांचा वाटा बघता तो भार सरकारलाही पेलवेनासा झाला होता. जागतिक नाणेनिधि व व्यापार  संस्थांच्या  अनुदाने  बंद करण्याबद्दलच्या वाढत्या दबावाची कु-हाड अगोदर खतांच्या अनुदानांवर आली. असंघटीत व कमजोर शेतक-यांकडून यावर काही विरोध होणार नाही हे सरकारच्या अपेक्षेनुसारच झाले. (शेतक-यांची खतावरची ही अनुदाने कुठे आहेत हे आज कुणालाही सांगता येणार नाहीत. उलट शेतक-यांना वारेमाप किंमतीत काळ्याबाजारात ही खते घ्यावी लागताहेत.)  मात्र नवश्रीमंत व सहाव्या वेतन आयोगाने पुष्ट झालेल्या मध्यम वर्गाने त्यांना गरज नसलेल्या अनुदानातील थोड्याशा कपातीमुळे झालेल्या या फुटकळ दरवाढीला ज्या पध्दतीने विरोध केला आहे त्यावरून या सा-या प्रक्रियांचा लाभ देशातील सत्तर टक्के वंचित जनतेपर्यंत पोहचू नयेत अशीच त्यांची इच्छा असल्याचा अर्थ त्यातून काढता येईल. उद्योग क्षेत्राने या निर्णयाचे स्वागतच केले आहे. किंबहुना सरकारला हा निर्णय घेणे भाग पाडण्यात या क्षेत्राचाच महत्वाचा वाटा आहे. भारताच्या या बहुढंगी व बहुपेडी स्वरूपामुळे पुढे ठाकलेल्या समस्यांवर अचूक आर्थिक उपाय व सर्वंकष राजकीय तोडगा शोधणे हे तेवढे सोपे राहिलेले नाही हे या निमित्ताने लक्षात आले तरी पुरे !
      डॉ.गिरधर पाटील. 9422263689   girdhar.patil@gmail.com

सोमवार, २० जून, २०१६

निसरडे प्रशासन, घसरते शेतकरी !!



         निसरडे प्रशासन, घसरते शेतकरी !!
          प्रशासन हा सरकारचा एक अविभाज्य भाग असतो. विधीमंडळाने संमत केलेल्या सा-या कायद्यांची अंमलबजावणी व त्यानुसार कारभार ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी. यासाठी या प्रशासनाला काही अधिकारही दिलेले असतात व भारतीय घटनेतदेखील प्रशासनाला यासाठी ब-यापैकी संरक्षणही दिलेले आहे. गमतीने म्हटले जाते की लग्न लावून आणलेल्या बायकोला घटस्फोट देऊन तिच्यापासून वेगळे होणे सहज शक्य आहे, मात्र एकदा सरकारात चिकटलेल्या कर्मचा-याला कामावरून काढणे तितकेच कठीण आहे. या वैधानिक संरक्षणाबरोबर आपल्या संघटितपणाच्या जोरावर या प्रशासनाने जनहितापेक्षा आपले वर्गीय हितसंबंध राखणारे अनेक निर्णय वा परंपरा पाडून ठेवल्या आहेत. त्यात करावयाचा बदल हाही त्यांच्याच हाती असल्यामुळे त्यावर काही कारवाई होणे दुरापास्त होऊन बसले आहे. वास्तवात प्रशासनाने असे संरक्षण व फायदे उपभोगण्याला तशी कुणाची हरकत असण्याचे कारण नाही परंतु याचा दुष्परिणाम म्हणून आता हे प्रशासन कशालाही व कुणालाही न जुमानणारे व आपल्या योगदानाविषयी उत्तरदायी न राहिल्याचे दिसते आहे. त्यातून भ्रष्टाचारासारखे महाराक्षस निर्माण होत प्रसंगी लोकप्रतिनिधींशी संगनमत करून सार्वजनिक मालमत्ता हडप करण्याचे प्रकार नित्यनेमाने उघडकीस येऊ लागले आहेत.
   खरे म्हणजे या लेखाचे शिर्षक निसरडे प्रशासन घसरती जनता असे असायला हवे होते. परंतु चोराचोरांतील भांडण वेगळे व प्रामाणिक व चोरातील भांडण वेगळे यामुळे शेतक-यांची होणारी ससेहोलपट ही प्रशासन व शेतकरी यात नेमकी शेतक-याची काही चूक वा दोष नसल्याने प्राधान्याने घेतली आहे. शेतकरी वगळता इतर वर्गांशी होणारा भ्रष्टाचार निपटण्यात हे वर्ग तसे सक्षम असल्याने त्यांची भ्रष्टाचाराविरोधाची ओरड ही केवळ नैतिकतेचा आधार घेत एक चर्चेचा विषय असतो कारण दुस-या मार्गाने तेच भ्रष्टाचाराचे लाभार्थीही असू शकतात. मात्र शेतक-यांना व्यावहारिक पातळीवर या भ्रष्टाचाराला तोंड देतांना काय व कसे नाकेनऊ येतात हे यानी बाधित झालेले शेतकरीच सांगू शकतील. शेतक-यांचा व्यक्तीगतरित्या येणा-या शासकीय संबंधात होणारा भ्रष्टाचार हा एक भाग तर शासनात शेतक-यांच्या नावाने येणारी अनुदाने, मदती व पॅकेजेस यात होणारा भ्रष्टाचार हाही शेवटी शेतक-यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरत असतो. याविषयातील अनेक प्रकरणे बाहेर येऊन त्यातील भ्रष्टाचार सिध्द झाला तरी आजवर कुणाही शासकीय कर्मचा-याला शिक्षा झालेली नाही हे यातील महत्वाचे वैशिष्ठ्य.
एकाद्या तलाठ्याने केलेले फेरफार न्याय्य पातळीवर दोषी सिध्द झाले तरी त्याला मात्र काहीच होत नाही. मात्र ही चूकीची दुरुस्ती करण्यात शेतक-यांची एकादी पिढी सरकारात हेलपाटे मारण्यात, दोन चार एकर जमीन कोर्टकचे-यां व वकिलांसाठी व त्यामुळे अगोदरच तोट्यात असलेल्या शेतीकडे दूर्लक्ष, या सा-याला मात्र शेतक-यालाच बळी पडावे लागते, त्याच वेळी मात्र तलाठी, सर्कल वा सारी महसूली यंत्रणा मजेत आपले जीवन व्यतीत करीत रहातात. शेतक-यांनी लाईटबिल भरले नाही तर त्यावर कारवाई मात्र हप्ते देऊन वीज वापरणा-यांवर लाखो करोंडोंचे बिल झाले तरी कारवाई नाही असा हा मामला असतो. जमीन खरेदीच्यावेळी नोंदणी अधिकारी नाना त-हेची खुसपटे काढून आपला खिसा गरम करतो तर नुकत्याच भोसरीच्या जमीन खरेदीच्या प्रकरणात इतर अधिकारात एमआयडीसीचे नाव असून देखील या नोदणी अधिका-याने त्यांची हरकत मागवली नाही. किमान या जागेवर ज्यांचे कारखाने वैधरित्या चालू आहेत त्यांनाही काही विचारण्यात आले नाही. त्याच्या या सहेतुक दूर्लक्षाबाबत त्याच्यावर काय कारवाई झाली तर काही नाही. अनधिकृत बांधकामात सा-या परवानग्या देणारे अधिकारी व प्रत्यक्ष बांधकाम करणारे बिल्डर नामोनिराळे रहात रहिवाशांवर मात्र तत्परतेने घर पाडायची कारवाई. आत्महत्याग्रस्त शेतक-यांसाठी आलेल्या मागच्या पंतप्रधान पॅकेजेमध्ये भ्रष्टाचार सिध्द होऊन त्यात चारशे शासकीय कर्मचारी दोषी सिध्द होऊनही त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही. सिंचन घोटाळ्यात ज्यांच्या सहीने सारा भ्रष्टाचार झाला आहे अशा एकाही अधिका-यावर कारवाई झालेली नाही. काही प्रकरणात जनक्षोभ लक्षात घेऊन काही कर्मचा-यांना तात्पुरते निलंबित केले जात असले तरी असे कर्मचारी परत नुसते कामावरच घेतले जात नाहीत तर त्यांना बक्षिसी म्हणून पदोन्नती दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा या प्रशासनावर शासनाचे व शासकीय मालमत्तेचे सर्वतोपरि रक्षण करण्याची जबाबदारी असतांना त्यांनी आपले कर्तव्य नीट पार पाडले नाही तर त्याचा गैरफायदा घेणा-या अगोदर संबंधित शासकिय कर्मचा-यावर सर्वप्रथम कारवाई झाली तरच अशा प्रकारांना आळा बसेल व त्यांची पुनरावृत्ती होणार नाही.
शासकीय यंत्रणा जनतेवरील कारवाईत जेवढी उत्साही दिसते तेवढी शासकीय भ्रष्टाचारात दोषी असलेल्यांच्या बाबतीत दिसत नाही याची काही निश्चित कारणे आहेत व त्याला आपली सध्याची राजकीय व्यवस्था जबाबदार असल्याचे दिसते. या व्यवस्थेचे सारे कामकाजच देण्याघेण्याच्या व्यवहारावर आधारलेले आहे. पक्षात पद हवे, पैसे द्या, निवडणुकीत तिकिट हवे, पैसे मोजा, मंत्री व्हायचे पैसे टेका, एवढेच नव्हे तर सत्तेच्या पदावर टिकून रहाण्यासाठी कायम पैसे चारत रहा, अर्थात हे कुणाला हे सांगायला नको. सरकारी कर्मचारीही नोकरीत लागतांना भरमसाठ पैसे देऊनच आलेला असतो. स्पर्धा परिक्षांचे पेपरफुटीला पैसे, मार्क वाढवून घ्यायला पैसे, एवढेच नव्हे तर अशारितीने उत्तीर्ण झाल्यावर पोस्टींगसाठीही पैसे असा सारा देण्याघेण्याचा मामला सर्रासपणे रूढ झाला आहे. चांगली खाण्याची जागा हवी असेल वा बदली करून घ्यायची असली तरी पैसे. अशा या व्यवहारातून झालेल्या गुंतवणुकाची वसूली कशी तर आपल्या अधिकाराचा गैरवापर करत सामान्य जनतेला वेठीस धरायचे व आपला हिशोब चुकता करायचा. निवडून आलेले लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकारी हे सतत या दुष्टचक्रात व्यस्त रहातात व जनतेची सेवा हे त्यांचे मूळ काम विसरून पैसे खाण्याचे निरनिराळे मार्ग चोखाळत व शोधत रहातात.
आता यावर जी काही उपाय योजना करायची आहे ती लोकप्रतिनिधी व प्रशासनाने मिळून करायची आहे. तेच जर या नाटकाचे मुख्य सुत्रधार असतील तर त्यात होणा-या दुरुस्तीची अपेक्षा ही फोल ठरते व आताची व्यवस्था ही तशी सत्ताधारी व अधिकारी यांच्या फायद्याचीच असल्याचे गृहित धरत येरे माझ्या मागल्या या न्यायाने ती पुढे चालू रहाते.
                                        डॉ. गिरधर पाटील. 9422263689.

रविवार, १२ जून, २०१६

वास्तव कृषिक्षेत्राचे



                    वास्तव कृषिक्षेत्राचे
भारतीय अर्थव्यवस्था सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती किमान पातळीला पोहचल्याने कधी नव्हे ती सुस्थितीत आल्याचे दिसते आहे. मात्र ही परिस्थिती कायम टिकेल असे वाटत नाही. कारण अर्थव्यवस्था स्थिरावून ती वृध्दिंगत होण्यासाठीचे प्रयत्न नेमके औद्योगिकरणाची कास धरल्याने एक फसलेला प्रयोग म्हणून ठरण्याची शक्यता आहे. शेतात पिकलं पण बाजारात गमावलं असं आपल्याकडे म्हटलं जातं ते योग्यच आहे कारण कुठल्याही लाभाचे फायदे त्या क्षेत्राला प्रत्यक्षात मिळणे हेच त्या अर्थव्यवस्थेचे ध्येय असायला हवे. भारतीय शेतीची आजची अवस्था बघता तिला प्राधान्याने प्रोत्साहित करण्याची गरज अजूनही आपल्याकडे त्या आघाडीवर दूर्लक्ष होत असल्याचे दिसते आहे.
सा-या परिस्थितीचे विश्लेषण वा मूल्यमापन तज्ञ आपापल्या परीने करतीलच परंतु सर्वसामान्य जनता, विषेशतः बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण व तिचे अर्थकारण, जे कृषि निगडीत आहे, त्याच्याशी जुळलेली असल्याने या क्षेत्रातील सुधारांना आजही न्याय्य प्राधान्य नसल्याने या क्षेत्राने अजून किती काळ आपल्या उध्दाराची वाट पहायची हे ठरवावे लागणार आहे. तसे पहायला गेले तर आजवरच्या सा-या आर्थिक संकटातून आपण या तळागाळात दृढ असलेल्या कृषि अर्थकारणामुळेच सावरत आलो आहोत. नाही तर असा पाया नसलेल्या, केवळ इतर क्षेत्रांवर अवलंबून असलेल्या मेक्सिको वा कोरिया सारखी आपली परिस्थिती झाली असती. भारतात आर्थिक क्षेत्रात आगळीक करायची चैन ही कृषिक्षेत्राच्या बळावरच शक्य आहे हेही या निमित्ताने लक्षात घेतले पाहिजे.
सा-या जगात आलेल्या औद्योगिकरणाच्या लाटेत भारतही सापडणार हे अपरिहार्य असले तरी कृषिप्रधान समजल्या जाणा-या व असलेल्या भारतात औद्योगिक क्षेत्राला कृषिच्या मानाने नेहमीच झुकते माप मिळत आले आहे. या सापत्नभावाच्या वागणूकीत कृषिक्षेत्रात निर्माण होणारे भांडवल औद्योगिक क्षेत्राकडे वळवण्यापासून, बंदिस्तपणा व शासकीय हस्तक्षेपातून झालेल्या भांडवल -हासामुळे कर्जबाजारी होत लाखो शेतक-यांना आत्महत्यांना सामोरे जावे लागले आहे. मूळचा आपला औद्योगिकरणाचा पिंड नसतांना त्यामागे लागल्यामुळे आजचे अनिर्बंध व बकाल शहरीकरण व त्यातून निर्माण झालेल्या अनेक नवीन समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. त्याचवेळी कृषिक्षेत्राला त्याचा न्याय्य वाटा, सहभाग व प्राधान्य न मिळाल्याने या क्षेत्रातही आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुर्दैवाने औद्योगिक क्षेत्राच्या दुरवस्थेबाबत जेवढे बोलले, लिहिले वा केले जाते तेवढे कृषिक्षेत्रच्या दुरवस्थेबाबत होत नसल्याने या क्षेत्राला कुणी वालीच नसल्याचे दिसते आहे.
कधी नव्हे तो एकाद्या वर्षी शेतक-यांना मिळालेल्या ७१००० कोटींच्या कर्जमाफीचा जेवढा गाजावाजा झाला, त्याच वर्षी राष्ट्रीकृत बँकानी औद्योगिक क्षेत्राचा १ लाख २४००० कोटींचा एनपीए गुपचुप राईट ऑफ करून टाकला. अशा नियमित सवलती व बेलआऊट पॅकेज मिळणा-या औद्योगिक क्षेत्राला स्पर्धामुक्त संरक्षण देऊनसुध्दा देशाच्या अर्थकारणात त्यांचे काही भरीव योगदान असल्याचे दिसून येत नाही. त्या उलट अतिशय प्रतिकूल परिस्थिती मग ती अस्मानी असो की सुलतानी, तिला तोंड देत, देशाची अन्नधान्याची गरज भागवत निर्यातीत देखील लक्षणीय प्रगती कृषिक्षेत्राने दाखवली आहे. उलट सरकारच या वाढीव उत्पन्नाला न्याय देण्यात कमी पडत असून आपल्या चूकीच्या धोरणांमुळे साठवणूकीत कमी पडल्याने कष्टाने पिकवलेल्या धान्याच्या, एकप्रकारे शेतक-यांनी निर्माण केलेल्या राष्ट्रिय संपत्तीच्या नाशाला कारणीभूत होत आहे.
भारतातील समृध्द निसर्ग, मान्सूनची उपलब्धता, भरपूर सूर्यप्रकाश, कष्टाळू शेतकरी, व्यापक जीववैविधता ही शक्तीस्थळे असलेल्या कृषिक्षेत्राचा आपण पुरेपुर उपयोग करू शकलेलो नाहीत हे वास्तव आहे. तसा भारत देश हा मसाल्याचे पदार्थ, कापड, चहा अशा निर्यातींसाठी अगोदरच प्रसिध्द होता. नंतरच्या काळात कापूस, साखर, कांदा, द्राक्षे. तंबाखू, मांसमच्छी, भाजीपाला एवढेच नव्हे तर धान्याच्या निर्यातीतही आपण चांगला टप्पा गाठला आहे. या क्षेत्राला रास्त प्रोत्साहन मिळाले तर असंख्य रोजगाराच्या संधी, प्रक्रिया उद्योग, देशांतर्गत वितरण व व्यापार, निर्याती या सा-या क्षेत्रात कराल तेवढ्या थोड्या संधी उपलब्ध असल्याचे दिसून येईल.
या सा-या आव्हानांना पेलण्यास भारतीय शेतकरी निश्चितच सक्षम असल्याचे अनेकवेळा सिध्द झाले आहे. त्याचे आजवरचे हिरावले गेलेले भांडवल जर त्याला परत देता आले तर तो परत या देशाला आर्थिक स्थिरता देऊ शकतो. जागतिकीकरण स्वीकारतांना वाणिज्य खात्याने जागतिक व्यापार संस्थेला दिलेल्या माहितीत शेतक-यांच्या हिरावल्या गेलेल्या भांडवलाचा उल्लेख आहे. या क्षेत्रात काम करणा-या तज्ञांच्या मते हा आकडा तीनशे लाख कोटींचा आहे. यातला गमतीचा भाग असा की आपली सार्वजनिक उद्योगातली गुंतवणूकही जवळ जवळ तेवढीच आहे. यावरून शेतक-यांचे भांडवल कुठे गेले आहे हे लक्षात येईल. सरकारला हा सार्वजनिक उद्योगाचा भार न पेलवण्याने शेवटी निर्गुंतवणीला सामोरे जावे लागले व या कंपन्या विकाव्या लागल्या. त्यातून मिळालेल्या निधीचा कृषिक्षेत्राला लाभ झालेला दिसत नाही. आज सरकार या क्षेत्राला स्वबळावर काही देऊ शकत नाही. परकीय गुंतवणूकदारांना या क्षेत्रात असलेल्या सुप्त खजिन्याचा वास लागल्याने ते गुंतवणुकीसाठी तयार असूनसुध्दा भारतातील राजकीय सुंदोपसुंदीमुळे ही परकीय गुंतवणूक भारतात येऊ दिली जात नाही.
हे कमी पडते की काय म्हणून शेतक-यांच्या उपजाऊ जमीनी गिळंकृत करणारे औद्योगिक सेझ, नैसर्गिक खनिजांच्या उत्खननापोटी होणारी जमिनींची हेळसांड, शेतजमिनींच्या खरेदीविक्रीत धूमाकूळ घालणारा भ्रष्टाचारातील पैसा, शेतमाल बाजाराची वाढत जाणारी गळचेपी, हिरावून घेतले जाणारे तंत्रज्ञान स्वातंत्र्य या सा-या संकटांची मालिका बघितली तर आपल्या अशा या धोरणांनी सरकार या क्षेत्राला कुठे नेऊन पोचवणार हे लक्षात येते.
शेतक-यांच्या नशीबी हे सारे यायचे कारण स्पष्ट आहे की तो राजकीय दृष्ट्या स्वतःला एक वर्ग मानत नाही. त्याच्या वर्गविषयक संकल्पना धूसर असल्याने निवडणुकांच्या राजकारणात शेती या मुद्याव्यतिरिक्त जातपात, पैसा, गावगुंडीचे राजकारण, आर्थिक नियंत्रणाच्या नाड्या, व फालतु अस्मितावाद, यासारख्या मुद्यांवर मतदान होते. चाणाक्ष राजकीय पक्षांनी शेतक-यांची मते गृहित धरलेली असतात व गावोगावी असलेल्या सत्तेच्या दलालांमार्फत ही मते कशी हस्तगत करायची याचा जबर आत्मविश्वास या राजकीय मंडळींना आलेला आहे. आपल्या उपजिविकेशी निगडीत असलेल्या शेती या विषयावर केंद्रीभूत होऊन ज्या दिवशी सारे शेतकरी आपल्या प्रत्यक्ष कृतीने या निवडणुकाच्या राजकारणावर परिणाम करू शकतो असे दाखवतील, तेव्हाच त्यांच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल असे वाटते.
                                                 डॉ.गिरधर पाटील 9422263689