तोट्याचा
धनी शेतकरी
गेल्या
आठवड्यात एक टन कांदा विकून एक रूपया देणारी बाजार समितीची पावती व्हायरल होत
सा-या मिडियात फिरत होती. अशा इतर शेतक-यांच्या मूक पावत्या किती असतील याची गणतीच
करता येणार नाही. शेतमाल बाजाराची अत्यंत विदारक परिस्थिती दर्शवणारी ही बातमी
सरकारच्या बाजूने बोलणा-यांचीही पंचाईत करून गेली. सत्ताधा-यांत काहीका असेना याची
चर्चा झालीच असणार. दोन दोन लाख पगार घेणा-या सनदी अधिका-यांकडेही याचे उत्तर
नव्हते. मंत्र्यांना हा प्रश्न कळला तर त्यांना विचारण्यात अर्थ आहे, नाहीतरी
पुढच्या आठवड्यात पंतप्रधानांच्या कानी हा प्रश्न घालतो हे उत्तर मात्र ठरलेले.
म्हणजे एक निश्चित की शेतक-यांचे काहीका होईना आम्हाला काय त्याचे म्हणत सारी
व्यवस्था ढिम्मपणे लावण्यांचे कार्यक्रम करत आपली सत्ता उपभोगण्यात मग्न आहे.
मात्र मधेच असे काही विपरित घडले की सरकारच्या साखरझोपेत काहीतरी व्यत्यय येतो आणि
सरकार काहीतरी निर्णय जाहीर करून आपली मान सोडवून घ्यायचा प्रयत्न करते. आता
भाजीपाला व फळे ही बाजार समितीच्य नियंत्रणातून बाहेर काढणार व सरकार पंचवीस
कोटींचा कांदा खरेदी करणार हे ते दोन निर्णय आम्ही सरकारात आहोत हे स्पष्ट
करण्यासाठी जाहीर करण्यात आले. पैकी विनियंत्रणाच्या निर्णयाचे सर्वाधिकार हे
व्यापारी, आडते व माथाड्यांच्या हाती असल्याने तो राबवला जाईलच याची कुठली हमी
देता येत नाही. तसाच पंचवीस कोटींचा कांदा खरेदीचा निर्णय हा हवेतच विरण्याची
शक्यता आहे.
मात्र निर्णय
कुठलाका असेना त्यातून आपला स्वार्थ साधण्याचे अजब कसब आपल्या राजकारण्यांना
प्राप्त झाले आहे. असे निर्णय अभ्यासातून वा गांभिर्याने घेतले आहेत असेही कधी
नसते, कारण असे स्वयंनिर्णय घेण्याची क्षमता आपली सरकार नावाची व्यवस्था कधीच
गमावून बसली आहे. याचे अगदी समर्पक उदाहरण म्हणजे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेतून
सावरण्यासाठी जागतिकीकरणाचा नाईलाजाने का होईना घ्यावा लागलेला निर्णय नेमका काय
आहे व कुणाच्या फायद्याचा आहे हे सरकारच्याच लक्षात न आल्याने घेतलेल्या निर्णयाचे
समर्थन तर अपरिहार्य मात्र त्यातला अर्थ न उमगल्याने त्याच्या अंमलबजावणीत अक्षम्य
हेळसांड यामुळे हा निर्णय घेऊन सुध्दा त्याचा देशाला वा सर्वसामान्यांना फारसा
फायदा झालेला नाही. ज्या क्षेत्रांना यातला अर्थ कळू शकला ते माहिती तंत्रज्ञान,
संपर्क दळणवळण व सेवाक्षेत्राने जागतिकीकरणाचा नेमका फायदा उचलत आपला उत्कर्ष करून
घेतला हे सर्वज्ञात आहे. यात महत्वाची गोष्ट अशी की या सा-या क्षेत्रात सरकारचा
हस्तक्षेप दुरान्वयानेही पोहचू न शकल्याने त्यांची प्रगती शक्य झाली मात्र शेतीत
सरकारचा प्रचंड हस्तक्षेप असल्याने शेतीक्षेत्राची आणखी परवडच झालेली दिसते.
जागतिकीकरणाचा
हा एक मोठा निर्णय ठळकपणे सर्वांच्या नजरेत भरत असला तरी जागतिक बँक वा नाणेनिधी
संस्थेबरोबर झालेल्या कराररानुसार अनेक निर्णय आपण अगोदरच घेऊन ठेवले आहेत वा घेऊन
ठेवावे लागले आहेत. मग तो माहितीच्या अधिकाराचा असेल, विविध योजनातील जनतेच्या
सहभागाचा असेल, मानवाधिकाराचा, महिला व बाल कल्याणाचा, शेतमाल बाजारातील मॉडेल
एक्टचा, कुपोषणाचा वा अन्नसुरक्षेचा असेल, अगदी अलिकडचा म्हणजे औद्योगिक
क्षेत्रातील गुंतवणुकीचा सेझचा असेल वा मल्टी ब्रँड क्षेत्रातील एफ डी आयचा असेल
हे सारे निर्णय आपल्या सरकारला घ्यावे लागले आहेत, म्हणून सरकारला त्यांचे समर्थन
करणे क्रमप्राप्त आहे. या निर्णायातील संभाव्य लाभार्थी म्हणजे शेतकरी वा सामान्य
जनता असे भासवत त्यांच्याकडून राजकीय फायदा व या निर्णयांचे सरळ लाभार्थी म्हणजे
गुंतवणुकदार यांच्याकडून आर्थिक फायदा मिळवत चीत भी मेरी पटभी मेरी या तत्वानुसार
आपल्या राजकारण्यांच्या पाचो उंगलियाँ घीमे अशी परिस्थिती झाली आहे.
यातील या
सा-या गोंधळामुळे ज्या उद्देशाने हे सारे निर्णय घेतले वा घेतल्याचे भासवले जाते
त्यांचा प्रत्यक्ष फायदा कोणालाच होत नाही. वास्तवात जागतिकीकरण जर रेटून अवलंबले
असते तर शेतीसारख्या मूलभूत क्षेत्रात आपल्याला आघाडी घेता आली असती. जागतिक
व्यापार करारानुसार अनुदाने हटवत भारतीय शेतमालाला परकीय बाजारात मुसंडी मारायची
संधी मिळाली असती तर भांडवलाच्या शुष्कतेने बेजार झालेल्या या क्षेत्राला दिलासा
मिळत एक प्रचंड आर्थिक स्त्रोत या तळागाळाच्या लोकसंख्येपर्यंत पोहचू शकला असता.
शेतक-यांना उत्पादनात फारशा प्रोत्साहनाची गरज नाही कारण उत्पादनाच्या बाबतीत अनेक
प्रतिकूल परिस्थितीतून देखील आपण आघाडी घेतली आहे. या क्षेत्राचे खरे दुखणे आहे
बाजार व तंत्रज्ञान स्वातंत्र्याचे. याबाबतीत जागतिक पातळी तर सोडा खुद्द भारतातच
एवढी विदारक परिस्थती आहे की हे सारे अडथळे कसे पार करायचे असा प्रश्न भारतीय
कृषिक्षेत्रापुढे पडला आहे.
आज
भारतातील पणन मंत्र्यांना शेतकरी आपला शेतमाल कुठेही कोणालाही विकू शकतात हे वाजत
गाजत कार्यक्रम घेऊन जाहीर करावे लागते. आपले हे अपयश आहे व असे जाहीर करण्यात
आपलीच नामुष्की आहे असे त्यांना दुरान्वयानेही वाटत नाही यातच सारे आले. याच बाजार
समित्यांमध्ये शेतमालाचे वजन न करतांच अंदाजाने, ढिगाने वा शेकड्याने विक्री होते
हे पणन मंत्र्यांच्या गावीही नव्हते, एका पणन संचालकाने त्याबाबतचा आदेश काढल्यावर
असे चालते हे सा-यांच्या लक्षात आले. शेतक-यांचा काहीएक संबंध नसलेल्या आडतीची लूट
ही न्यायालयाने फटकारूनही बंद होऊ शकली नाही व सरकारला त्याबाबतीत समितीचा अहवाल
येऊन आता वर्ष लोटले तरी काही सोयरसुतक नसल्याचे दिसते आहे. या अत्यानुधिक जगात आजवर शेतक-यांना त्यांचा
माल खुल्या बाजारात विकता येत नव्हता व या पापाचे धनी आपणच आहोत हे ज्या सरकारला
अजूनही कळत नाही अशांच्या हाती आपण आपले भवितव्य दिले आहे याचे वैषम्य वाटते. ही
सारी राज्यकर्ती मंडळी शेतकरी समाजातूनच आली आहे हे पहाता हे वैषम्य आणिकच गडद
होते.
आता मात्र
आपल्याला या दुरवस्थेतून सोडवायला बाहेरून कोणी येईल याची वाट न बघता आपणच कंबर
कसत आपल्या उज्वल भवितव्याची कास धरली पाहिजे हे भारतीय शेतक-यांनी एकदाचे ठरवले
पाहिजे.
डॉ. गिरधर पाटील 9422263689
